*हा तर सनातनी मानसिकतेचा प्रकार* *आळंदी येथील घटनेचा आम आदमी पार्टीने केला निषेध*

*हा तर सनातनी मानसिकतेचा प्रकार*  *आळंदी येथील घटनेचा आम आदमी पार्टीने केला निषेध*

पंढरपूर/प्रतिनीधी 

आळंदीहून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांना पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आम आदमी पार्टीने याचा तीव्र शब्दात निषेध केला असून यासंदर्भात शिंदे फडवणीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पंढरपूरमध्ये आम आदमी पार्टीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले उपस्थित होते.


विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी या पालखीमध्ये सामील होतात. या पालखीला 300 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. आणि वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गाने जाणारा, सर्व परिस्थितीशी विनातक्रार जुळवून घेत माऊलीच्या ओढीने हा वर्षानुवर्षे यात्रेचा प्रवास करीत असतो. या परंपरेला गालबोट लागणारी घटना घडल्याचे आजवर कधीही समोर आलेले नाही. परंतु आज पोलिसांनी लाठीमार व बळाचा वापर केला. हे करण्यासाठी पोलिसांना आदेश कुणी दिले होते? गृहमंत्री पद सांभाळणारे फडणवीस यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे मत आम आदमी पार्टीकडून व्यक्त करण्यात आले.

२०१८ मध्ये भाजप सत्तेत असताना वारीमध्ये साप सोडली जाण्याची भीती व्यक्त करून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडवला गेला होता. आताही भाजप आणि शिंदे गट सत्तेत असताना ही घटना घडली आहे. वारकऱ्यांसोबतचा लाठीमार आणि बळाचा वापर होताना आज भाजपच्या खऱ्या मानसिकतेचे दर्शन जनतेस झाले आहे.  फडणवीस यांचा क्रूर चेहरा समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना त्रास देणाऱ्या सनातनी मानसिकतेचेच हे प्रतिबिंब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आम आदमी पार्टी या लाठीमाराचा निषेध करीत असून, यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी वारकरी संप्रदायाची सपशेल माफी मागावी अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष बंडू मोरे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष संभाजी गांडुळे, शहर अध्यक्ष श्रीरंग बागल आदींसह आपचे बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते.