*दिव्यांगप्रमाणे इतरही निराधार लाभार्थींचेही अनुदान वाढवा* *श्रावणबाळ माता पिता सेवा सामाजिक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* *हजारों निराधारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिले निवेदन* *आ. अभिजीत पाटील यांनी उपस्थित निराधारांच्या प्रश्नासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्याचे दिले आश्वासन*
पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसह इतर लाभार्थींनाही दिव्यांग लाभार्थी प्रमाणे अनुदान वाढवून ते सरसकट अडीच हजार रुपये देण्यात यावे. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. श्रावण बाळ माता-पिता सेवा सामाजिक संघटनेचे राज्यअध्यक्ष तानाजी जाधव यांचे नेतृत्वाखाली पंढरपूरचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अनुदान आज पर्यंत मिळण्यात येत होते. दरमहा मिळणारे अनुदान हे आजच्या महागाईच्या काळात आर्थिक खर्चाच्या बाबतीत बरीच मोठी तपावत दिसून येते .त्यामुळे त्यांना दरमहा बँकेकडे हेलपाटे मारण्यातच सर्व पैसे खर्ची पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे .शासनाने राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा विचार करून दि.3 सप्टेंबर 2025 रोजी च्या मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचा अनुदानात हजार रुपये ची वाढ झाल्याने, त्यांना आता मिळणारे एकूण अनुदान अडीच हजार रुपये इतकी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील दिव्यांगांना त्याचा लाभ झाला आहे. राज्यात या योजनेतील निराधार शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती ,विधवा ,परितक्या , देवदासी , ६५ वर्षा वरील श्रावणबाळ सेवा योजना यांना मात्र जाणून- बुजून वाढीव अनुदानापासून शासनाने वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप श्रावणबाळ माता-पिता सेवा संघटनेचे राज्यअध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग, श्रावणबाळ सेवा ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना इत्यादी पाच योजनांचा मिळून संजय गांधी निराधार योजनेत विशेष सहाय्य योजनेत समावेश करण्यात आलेला आहे परंतु शासनाने फक्त (अपंग )दिव्यांग या एकाच योजनेच्या अनुदान वाढीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे राहिलेल्या विविध पात्र योजनेतील लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून, उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना दैनंदिन उपजीविकेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदान कमी व अल्प असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे .त्यांना महागाईच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे 65 वर्षावरील श्रावणबाळ योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांना मोलमजुरी अथवा कष्टाचे काम करता येत नाही अशा माता पिता वृद्धांना श्रावणबाळ सेवा योजनेचा लाभ देण्यात येतो तर विधवा महिला लाभार्थी कुटुंबातील मुलांचे संगोपन लहान पणापासून हे १८ वर्ष मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन किंवा शिक्षणासाठी मयताच्या वारस पत्नीस मोठी रक्कम खर्च करावी लागत असल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दिव्यांग व इतर लाभार्थी ही संजय गांधी योजनेतील असल्याने त्यांनाही दिव्यांग प्रमाणे असल्याने श्रावण बाळ विधवा योजनेतील लाभार्थ्यांच्याही अनुदानात शासनाने हजार रुपयाची वाढ करून एकूण मिळणारी अनुदान हे अडीच हजार रुपये देण्याचा मायबाप सरकारकडे करीत आहे. तरी नागपूर येथील होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राहिलेल्या गरजू लाभार्थ्यांच्या अनुदानात सरसकट अडीच हजार रुपये वाढ करून त्यांना दिलासा देण्यात यावा. अशी मागणी केली आहे.
या देण्यात आलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे. शासनाने दिव्यांग लाभार्थ्याप्रमाणे इतर सर्व योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट 1000 रुपये ची वाढ करण्यात यावी, राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेतील नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला असेल तर मयताच्या वारसांना वीस हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते मात्र त्यासाठी मयताचे नाव दारिद्र्य रेषे खालील यादीत समाविष्ट करणे बंधनकारक आहे ही अट रद्द करून मदतीच्या रकमेत वाढ करून मयताच्या वारसांना एक लाख रुपये देण्यात यावे.
श्रावण बाळ योजनेतील वृद्ध नागरिकांची वयाची अट 65 वर्षे वरून 60 वय वर्ष कमी करण्यात यावे. शासनाने लाभार्थ्यांच्या 21 हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करून दिव्यांगा प्रमाणे 50 हजार रुपये उत्पन्नाची अट करून ग्राम महसूल अधिकारी यांचे कडून देण्यात येणारा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा. इ.विविध मागण्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहेत वरील सर्व मागण्याची पूर्तता येणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळात करण्यात यावी , राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग सोडून वगळण्यात आलेल्या योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नाची शासनाने गंभीर दखल घ्यावी मागण्यांची पूर्तता न केल्यास येणाऱ्या कार्तिकी एकादशी दिवशी होणारी विठ्ठलाची महापूजा राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री व मंत्री यांच्या शुभहस्ते दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी ची विठ्ठलाची महापूजा रोखण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्ष डॉ.सुधाकर महानवर, कार्याध्यक्ष हरिदास मुजमुले, वारकरी संघटनेचे अध्यक्ष भानुदास बारडोले महाराज ,अशोक मोलाने ,सुनील जाधव , रामचंद्र वळणे, शिवाजी शिखरे ,राजाराम जाधव,इ. संघटनेचे पदाधिकारी वृद्ध नागरिक महिला भगिनी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी तहसील कार्यालयात हजारोच्या संख्येने खचाखच उपस्थित होते.